Ladki Bahin e-KYC : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. परंतु, आता या योजनेच्या लाभार्थी महिलांसमोर एक मोठी समस्या उभी राहिली आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे सरकारने अनिवार्य केले आहे, पण या प्रक्रियेची गती अत्यंत निराशाजनक असल्याने लाखो महिलांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या महत्त्वाच्या कामासाठी आता लाभार्थी महिलांच्या हाती अवघे १२ दिवस उरले आहेत.
महत्त्वाची आकडेवारी चिंताजनक
योजनेच्या एकूण २.४० कोटी लाभार्थी महिलांपैकी अद्यापही सुमारे १ कोटी ६० लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. आत्तापर्यंत केवळ ८० लाख महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे, ज्या महिलांनी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचा पुढील हप्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे.
तांत्रिक अडचणींचा मोठा अडथळा
ई-केवायसीच्या या मंद गतीमागे अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यातील सर्वात मोठी समस्या विधवा आणि घटस्फोटीत महिलांच्या ई-केवायसीमध्ये येत आहे.
- ई-केवायसी करताना लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार कार्डासोबतच, कुटुंबातील सदस्याचा (पती किंवा वडिलांचा) आधार क्रमांक आणि ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी करावी लागते.
- ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना आधार क्रमांकाची माहिती देणे किंवा त्यासंबंधीचा ओटीपी मिळवणे शक्य होत नाही. यामुळे या महिलांची प्रक्रिया पूर्ण होत नाहीये.
Ladki Bahin e-KYC मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती
महिला व बालविकास विभागाने या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या अडचणींची कबुली दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी गरजेची आहे.
त्यांनी सांगितले की, “विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी काम सुरू आहे. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन तांत्रिक प्रणालीत सुधारणा करण्याचे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
अंतिम मुदत कायम, त्वरित करा ई-केवायसी!
पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई-केवायसीची मुदत १५ दिवसांनी वाढवली असली तरी, उर्वरित सर्व महिलांसाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत कायम आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की, त्यांनी या मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांसाठी त्यांना अडचण येऊ शकते.
पात्र महिलांनी हप्ता बंद होण्याची वेळ येऊ नये यासाठी तातडीने या प्रक्रियेला पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.







