Seed Subsidy केंद्र सरकार शेतकऱ्यांना देण्यात येणारे बियाणे अनुदान (Seed Subsidy) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत असल्याची महत्त्वाची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली आहे. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांना केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता, फुलशेती, फळबाग शेती आणि सेंद्रिय शेती (Organic Farming) यांसारख्या पर्यायी आणि फायदेशीर पिकांकडे वळण्याचे आवाहन केले.
ग्लोबल विकास या सामाजिक संस्थेच्या वतीने परळी वैजनाथ (जि. बीड) तालुक्यातील शिरोळा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
बियाणे अनुदान थेट खात्यात (DBT) Seed Subsidy
केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार अनेक पाऊले उचलत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या बियाणे अनुदानाची रक्कम आता थेट त्यांच्या बँक खात्यात (Direct Benefit Transfer – DBT) जमा करण्याच्या प्रस्तावावर सध्या गांभीर्याने विचार सुरू आहे. हा निर्णय लागू झाल्यास अनुदानाच्या वितरणात मोठी पारदर्शकता येईल.
पर्यायी पिकांची निवड करा
सोयाबीन आणि कापसासारख्या पारंपारिक पिकांवर अवलंबून राहिल्याने अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी श्री. चव्हाण यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी फुलशेती, फळबाग शेती आणि सेंद्रिय शेती (Organic Farming) अंगीकार करावी. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि ते अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.”
अतिवृष्टी नुकसानीसाठी सरकार कटिबद्ध
यावेळी कृषिमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. “शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. नुकसानभरपाई आणि मदत देण्यासाठी दोन्ही सरकारे पूर्णपणे कटिबद्ध आहेत,” असे आश्वासन त्यांनी दिले.
कृषी माल थेट बाजारपेठेत पोहोचणार
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सरकारी संस्थांना कृषी माल थेट मोठ्या आणि शहरी बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यास सक्षम केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली. यामुळे शेत आणि शहरी बाजारपेठेमधील दरातील मोठी तफावत कमी होऊन शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळेल.
यावेळी ग्लोबल विकास संस्थेचे संस्थापक मयंक गांधी यांनी मार्गदर्शन केले. ग्लोबल विकास संस्थेने राबवलेले यशस्वी शेती मॉडेल देशभरात लागू करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. या संस्थेशी भागीदारी केल्यास शेतकऱ्यांचे भाग्य बदलण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांशी थेट संवाद
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी व्यासपीठावरून खाली उतरून मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. अनेक शेतकऱ्यांनी ‘मी शेतकरी, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार’ या घोषणेची पांढरी टोपी परिधान केली होती. खुद्द कृषीमंत्र्यांनीही ती टोपी घातल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
मेळाव्याच्या ठिकाणी ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, शेती उपकरणे आणि कृषी निविष्ठांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते, ज्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.








